शनिवार, २८ मार्च, २०२०

क्षण

तो तिच्यासाठी सगळं करायचा. आजपर्यंत त्याने तिचा शब्द खाली पडू दिला नव्हता. त्या एका शब्दासाठी जणू तो जगत होता. लोकं प्रेमात वेडे होतात असं ऐकलं होतं. इकडे तो प्रेमात वेडा होऊन आंधळा झाला होता. तिच्यासाठी डोळे झाकून निर्णय घ्यायचा तो.

ती पण त्याला वाटेल ते हक्काने मागायची. पण तिचा स्वभाव थोडं वेगळा होता. तिला प्रत्येक गोष्ट बोलायची सवय नव्हती. ती स्वतःच्याच विश्वात मश्गुल असायची. कधी कधी त्या नादात ती त्याला पण विसरून जायची.

त्याच्या आजूबाजूचे तिच्याबद्दल काहीबाही भरवायला लागले होते. ती तुझा वापर करतेय, मुली अश्याच असतात रे, तिला फक्त तुझा पैसा दिसतोय, एवढा भाव नसतो रे द्यायचा मुलींना वगैरे वगैरे, एक ना अनेक. सगळीकडून तिच्याबद्दलच्या वाईट साईट गोष्टींचा त्याच्यावर मारा चालला होता. पण अजून तो ह्याला बधला नव्हता. तो अजूनही तिच्यासाठीच झुरत होता.

पण थोडेच दिवसात नोकरीनिमित्त त्याला दुसरीकडे जावं लागलं. आता तर सगल्यागोष्टी अजूनच अवघड व्हायला लागल्या होत्या. आता रोज भेटता येणार नव्हत, मनातलं समोरासमोर बसून बोलता येणार नव्हतं, ते डोळ्यात डोळे घालून फक्त शांतता अनुभवणं होणार नव्हतं. संपर्काची साधनं कितीही वाढली तरी भेटण्याची एक वेगळीच ओढ असते, तो मोह कायमचा असतो.

Whatsapp आहे, Video Calling आहे, काही नाही तर फोन करून बोलता येतं. पण ते रोजच चाललंय ओ. या  long distance मध्ये बोलण्याचा मोह टाळता येत नाही. पण सारखं सारखं बोलणार तरी काय? सगळाच अतिरेक नुसता. त्या पेक्षा Old Style पत्र व्यवहार बरा. त्यात विरहाच्या अगदी उत्कट भावना ओतल्या जायच्या. नाहीतर काही दिवसांनी हे बोलणं म्हणजे नुसतं पाट्या टाकणं होऊन जातं. भेटण्याची खरी मज्जा ह्यामुळेच. दिवसाच्या शेवटी आपल्या प्रिय व्यक्ती भेटणारच हे नक्की माहिती असल्यामुळे दिवसभराचा पसारा मनात साठवता येतो.संध्याकाळी भेटल्यावर मात्र सगळा पसारा आपण त्या व्यक्तीपुढे मांडतो; काय सांगू अन काय नको असं होऊन जातं. नात्यातला जिवंतपणा टिकून राहतो. पत्र पण लांबून हाच जिवंतपणा किती सहजपणे टिकवतात!

त्यांच्या पण long distance मध्ये आता नेहेमीचेच प्रॉब्लेम यायला चालू झालं होतं. Reply वेळेवर न येणं, Reply च ण येणं, फोन केल्यावर बोलण्याच्या ऐवजी नुसतीच भांडणं. दिवसभर कामचा वैताग, त्यात तिच्याशी बोलता पण येत नाही, अजून वैताग. आजूबाजूच्यांच आताशा खरं वाटायला लागलं होतं, पण आतून मात्र अजून तो तसाच होता, भोळा, निरागस. मनात मात्र एक द्वंद्व चालू झालं होतं. काय खरं? काय खोटं? त्याला काहींही कळेनासं झालं होतं. संशयाने मनात जागा घेतली होती. कामाच्या नादात तिच्याकडे आपण दुर्लक्ष व्हायला लागलं होतं.

तिकडे तिची पण अवस्था वेगळी नव्हती. प्रत्येक वेळी काय reply द्यायचा ह्याचा विचार करून तिच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. हा पण रोज तेच प्रश्न विचारतो राव, आता नवीन काय सांगायचं? रोजच जेवते मी, रोजच बरी असते; अजून काय नवीन घडणार आहे रोज? त्यामुळे तिने त्याला असल्या फालतू प्रश्नांवर reply देणंच सोडून दिलं होतं. तिचा स्वभावाच तसा होता. सरळ, शांत, थोडासा एकलकोंडा. पण स्वतःच्या स्वभावाला मोडता घालून ती त्याच्याशी बोलायची खूप वेळ, त्याला सगळं सांगायची. पण तिला आता ह्याचा कंटाळा यायला लागला होता. तिच्या आत स्वतःसोबत एक वेगळंच द्वंद्व चालू झालं होतं. त्यात हा नेमका झोपायच्या वेळेला मेसेज करणार, ती पण दमलेली असायची, प्रत्येक वेळी रिप्लाय देणं तिला पण शक्य नव्हतं. त्यामुळे आता फोनवर पण ती त्याला टाळायला लागली होती.

ह्या सगळ्यातच फोनवर बोलणं झालं कि संवादाच्या ऐवजी व्हायचं ते फक्त भांडण. संवाद हरवला होता.

आता मात्र पाणी डोक्यावरून चाललं होतं. आता तिच्या स्वभाने मनावर अधिराज्य करायला सुरुवात केली होती. तिचा विचार आता पक्का झाला होता. आता संपवायचं हे सगळंच, बास झालं relationship वगैरे, आता एक घाव दोन तुकडे. मन तिला थांबवत होतं, पण स्वभावाने हात नेलाच मोबाईलकडे. त्याला फोन लावला तिने. त्याने अगदी पटकन उचलला फोन. जणू तिच्या फोनची वाट बघत तो फोन हातात घेऊन बसला होता. ह्या अचानक झालेल्या गोष्टीमुळे काय सांगायचं ह्यात ती गडबडून गेली आणि तिने पटकन फोन ठेवला.

त्याने परत फोन केला, तिने उचलला नाही. मनातलं द्वंद्व आता अधिकच वाढलं होतं. फोन तसाच रूमवर ठेऊन ती विचार करायला म्हणून खाली आली. समोरच तिला तो जाताना पाठमोरा दिसला. तिच्यासाठी तो एवढ्या लांब आला होता, तिला surprise देण्यासाठी. एक क्षण तिला पण वाटलं, एक आवाज द्यावा त्याला, थांबवावं, आपलं सगळं प्रेम व्यक्त करावं. पण ह्यावेळी मनानेच एक आवाज दिला आतून, ततिने त्याला थांबवलं नाही. दोघेही आपापल्या प्रवासाला निघाले होते.


एका क्षणात जग दोघांसाठी पण बदललं होतं.

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

रात्र


रात्र तशी बरीच झाली होती. टे दोघजण रस्त्यावर एकटेच हिंडत होते. दोघाही जण एकमेकांशी एक शब्द पण बोलत नव्हते. जणू त्या आवाजाने रात्रीची संपूर्ण शांतता भंग होईल.

बाहेरून बघणार्याला वाटेल कि ती आपल्याच विहारात चाललीये. तो मात्र सतत तिच्यावर नजर ठेवून होता. रात्री एकत्र चालताना डोळ्यात डोळे घालून पहायची हिम्मत नाही होत. अगदी एकटे असलो तरी. ती रात्र आपल्यापुढे आ वासून उभी असते आणि समोरच्याच्या सोल्यात पाहिल्यावर ना जाणो खरं बाहेर पडेल ह्याची भीती घालत असते. बोलायचं असलं तरी शांततेत, सगळा संवाद नुसता डोक्यात.

दिवसभरात काय काय झालं, कोण कोणाला आज काय म्हणालं, माझा बॉस कसा माथेफिरू आहे, त्या शेजारच्या ऑफिस मधले कायम कसे पार्टी करत असतात, एक ना अनेक असे सगळे विषय संध्याकाळीच बोलून झाले होते. संध्याकाळची वेळच तशी रोमांटीक, हातात हात घेऊन, एकमेकांच्या डोळ्यात बुडत जात छान बोलत बसण्याची. संध्याकाळचा एकटेपणा कंटाळवाणा; तशी रात्र मात्र पक्की; ती फक्त स्वतःची.

रात्रीला स्वतःच एक अंग आहे. रात्रीला एकटेपणा आवडतो, पण ती एकलकोंडी नाही, तिला बोलायला शब्दांची गरज नाही पडत. तिच्यात स्वतःचा असा एक वेगळाच रोमान्स आहे. नाईट आउटला आपण कितीही गप्पा मारायचा ठरवलं तरी शेवटी रात्र तुम्हाला शांत करते, पुढच्या गप्पा फक्त रात्र करते; शब्द प्रत्येकासाठी वेगळे, ज्याचे त्यालाच कळतात.


आता रस्त्यावरून जाताना तिने त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला, त्याने मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आता मात्र ती त्याला रागवायला म्हणून तोंड उघडणार म्हणून तिने परत त्याच्याकडे पाहिलं,पण रात्रीने सगळे शब्द खावून टाकले होते. आता मात्र त्याच्या लक्षात आलं आणि त्याने पण तिच्याकडे एक मिश्कील नजर टाकली. सगळा संवाद त्या एका कटाक्षामधेच झाला. तिची खोली आली होती. त्याने हसून पुढचा प्रवास चालू केला. 

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

गोंधळ




सध्या JNU वरून जो की गोंधळ चाललाय, तो गोंधळ माझ्या आतल्या आवाजाशी relate व्हायला लागलाय. सगळेजण आजूबाजूला गोंधळ घालताएत. Anti India Slogans, Nationalism, राष्ट्रहित, माझी बाजू, तुझी बाजू, ह्याची बाजू, फेसबुक वर post; आत कुठेतरी हाच गोंधळ सुरु होतो. माझा देश, माझी देशभावना, माझा आवाज. हा आवाज, ही भावना एक गोंधळ चालू करते आतल्या आत.

कट्ट्यावर १६ मे ला मोदीविजय साजरा करताना, आता सगळं कसा छान होणार ह्याच्या चर्चा चालू असताना, आता देशाची image चांगली होणार ह्याची स्वप्ना रंगवताना मनातला गोंधळ आता शांत होणार असा वातावरण तयार झाल होतं. पण मी तिकडे पण शांत होतो. राजकीय परिस्थितीबाबत आपण अजून उदासीनच, अशी भावना व्हायला लागली होती. किंवा त्या राजकीय बदलाबाबत प्रश्न पडत होते. विश्वास कोणावर आणि का ठेवायचा? परिस्थिती बदलणार म्हणजे नक्की काय होणार? शेवटचा प्रश्न स्वार्थावर येऊन थांबतो; ह्याने माझ्या जगण्यावर काय फरक पडणार आहे?

कोणत्याही विचारसरणीशी एक होणं मला कधीच जमल नाही. कधी वाटतं congress बरोबर, कधी वाटतं भाजप, डाव्यांच कधी काही चुकीच वाटतच नाही. पण सगळ्याच विचारसरणी जुनाट वाटायला लागल्यात. त्याचा माझ्या जगण्याशी काही संबंध उरला नाही असं वाटत असताना कुठेतरी सामान्य घरातल्या कोणावर तरी ह्या किंवा त्या विचारसरणीच्या लोकांचा हल्ला होतो. ह्या हल्ल्याच्या समर्थनार्थ किंवा विरोधात लोकं मोठमोठ्याने घसा फाडायला लागतात. वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून यायला लागतात. ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते असा भासवलं जातं. You have to be on one of the side to be safe.

इकडून भ्रष्टाचाराचे, देश लुटल्याचे दाखले दिले जातात; सावरकरांच नाव वापरल जातं. तिकडून स्वातंत्र्य लढ्याचे, देशाच्या प्रगतीचे दाखले दिले जातात. गांधीजींच नाव वापरलं जातं. मग युद्ध चालू होतं, गांधी विरुद्ध सावरकर. माझ्या मनात सुद्धा ते युद्ध पेटत. मी सावरकर वाचायला घेतो; विचार पटतात. मी गांधी वाचायला घेतो; विचार पटतात. युध्द तसच विचारांचा गोंधळ उडून जातो. हा गोंधळ बाहेर चाललेल्या गोंधळाचा आवाज असतो. तो वाढत जातो. पण कुठेतरी ते प्रकरण शांत होतं, किंवा शांत केलं जातं. त्या प्रकरणाचा ज्याला जसा पाहिजे तसा फायदा घेऊन झालेला असतो. मनातला गोंधळ आतल्या आत दबला जातो.

आता सरकार बदलतं; पुन्हा एकदा एखादा कन्हैया कुमार जेल मधे जातो. पुन्हा एकदा सगळ्यांकडून गोंधळ सुरु होतो. मनात विचारांचं वादळ घोंघावायला सुरु होतं. आपण नक्की कोणाला support करायचा? मी एक विद्यार्थी, मी nationalist, मी धर्म-जात न मानणारा, मी हिंदू, मी? मी नक्की कोण? हा प्रश्न उभा राहायला लागतो. Media ह्या सगळ्या गोंधळात सगळ्यात प्रवाही आणि प्रभावशाली. प्रकरणाचा गोंधळ चालू ठेवण्यात पटाईत. आम्ही रोज फेसबुक वर post  पाहायच्या, रोज टीव्हीवर बातम्या पाहायच्या. जिकडे तिकडे आम्हाला कन्हैय्या कुमार, त्याचे समर्थक आणि विरोधक दिसतात. सगळ्या पक्षाचे सगळेजण The Hour with Someone मध्ये गोंधळ घालताना दिसतात. देशभक्तीची उदाहरणं दिली जातात, freedom of expression च तुणतुण वाजवलं जातं, university मध्ये पोलीस घुसतात ह्यावर आश्चर्य व्यक्त केलं जातं.

ह्या सगळ्या काळात पण मी शांतच असतो. काय बोलावं? कोणाकडून बोलावं? ह्या घटनेच्या वेगवेगळ्या versions फिरायला लागतात. प्रत्येक version logically बरोबर. प्रत्येक जण बरोबर वाटायला लागतो. पण नेमकं विरोधक त्यात त्रुटी दाखवून देतो आणि मग गोंधळ पुन्हा सुरु; बाहेर आणि आत पण.

थोडे दिवसांनी news hour मधून विषय बाजूला जायला लागतो; prime time च्या ऐवजी बातमी superfast 50 मध्ये जायला लागते. पहिल्या पानावरून बातमी हळू हळू मागच्या पानांवर सरकायला लागते. माझा बातमी मधला रस आपोआप कमी व्हायला लागतो. कदाचित ज्यांना ह्या गोष्टीचा फायदा घ्यायचाय, त्यांचा फायदा घेऊन झालाय, हा युक्तिवाद मनातल्या गोंधळाला शांत करायला लागतो.
ह्या सगळ्याचा माझ्याशी जोडायचा प्रयत्न निरर्थक ठरतो. कोणत्याच विचारसरणीचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. मी अधिक insensitive होत जातो. घरी आल्यावर  बातम्यांऐवजी पुन्हा एकदा रटाळ मालिका, shows चालू होतात. फेसबुकवर देशभक्तीच्या post आज पण like करतो; पण comment मात्र कशावरच नाही. माझ्या रोजच्या जगण्यावर काहीच फरक पडलेला नाहीये. कट्ट्यावर मित्र अजूनही तसेच भांडतात. मी मात्र अजूनही शांत.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

“टिम लक लक ते टिम लक”




आज खूप दिवसांनी ‘रंग दे बसंती’ ची आठवण आली. त्यातला DJ आठवला. “ कॉलेज के गेट के ये तरफ हम जिंदगी को नाचते है तो दुजी तरफ जिंदगी हमे नचाती है.”
आजूबाजूला बघताना सारखा हा dialogue आठवतो. काय लिहिलंय! एका dialogue मधे आयुष्य मांडल्यासारखा वाटतं.

खरंय का हे? प्रश्न पडायला लागतो मला. आपलं पण जगणं ह्याच philosophy ने व्हायला लागलंय का? काय बदलतंय आजूबाजूचं? रोजचा तोच तोचपणा आहेच आयुष्यात. पण आतला एक आवाज आता life च्या तालावर नाचायला नाही म्हणतोय.

आताशा त्या टिम लक लक चा त्रास व्हायला लागलाय. तो ताल आता स्वतःविषयीचा चोतेपणा वाढीस लावायला लागलाय. नाही नाचायचं ह्या तालावर. प्रश्न खूप वाढत चाललेत. पण आता प्रश्न पण धूसर होत चाललेत. ह्या प्रश्नांची उत्तरं आता तो तालच द्यायला लागला आहे. ह्या तालाला पर्याय स[अडत नाहीये. कुठे चाललोय मी? हा ताल मला स्वतःमध्येच खेचत चालला आहे. एका मोठ्या empty space मध्ये.

इथे पण खूप लोक आहेत, आज पण खूप फोन येतात, रात्री अपरात्री मेसेज येतात, उशीरा घरी येणं अजूनही थांबलं नाहीये. हे सगळं कोणत्या तरी जुन्या दिवसांसारखा वाटतंय. पण फरक आहेच. रात्रीच्या फोन आणि मेसेज मध्ये काहीच भावना नाहीयेत. उशिरा घरी यायला तिकडे थांबायचं काहीच कारण नाहीये. लवकर घरी पोहोचावस वाटतं आता. ह्या आजूबाजूच्या गर्दीत आपला असा एकही चेहरा सापडत नाहीये.

त्या दिवसांची आठवण येऊन मी सारखा सारखा त्या कट्ट्यांवर जातो. त्या कट्ट्यावरची लोकं पण आता बदललीयेत. ओळखीचा असा एक पण चेहरा दिसत नाहीये इथे. कुठे गेलेत सगळे? काय करतायेत? कुठे होतो आपण? कॉलेजचा परिसर पुन्हा आठवायला लागलाय. ‘टिम लक लक ते टिम लक’ ह्या तालावरच दुसरा पण दिवस सुरु होतो, अगदी पहिल्यासारखा. आज पण कांचे फोन करण्यात आणि घेण्यात busy नेहेमीप्रमाणे.

पण मग एक फोन येतो. समोरून चार शिव्या ऐकायला मिळतात. ताल विरत चाललाय हळू हळू. संध्याकाळी हा अजून चार जणांना गोळा करतो. एकमेकांवर शिव्यांचा पाउस पडतो. ताल वाजायचा पूर्ण थथांबलाय. ती एक संध्याकाळ पुढचे काही दिवस मनात आणि मनात एकाच भावना “ DJ माझा एक मित्र पण तुझ्या theory ला हरवायला पुरेसा आहे.”

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

वळणं

वळणं

काहीच सुचेनासं झालंय आताशा. लिहिण्याचं एक spirit मरून गेलय, किंबहुना मारलं जातंय, सगळ्यांकडून आजूबाजूच्या. एक लेखक आतल्या आत घुसमटतो आहे. लिहिण्यासाठी. आणि आता लेखणी पण साथ देईनाशी झालीये.
हा लेखक कोणी मोठा किंवा established माणूस नाहीये. प्रयत्न करतोय तो हळू हळू; शिकण्याचा, observe करण्याचा. पण आता तू शिकण पण विसरून गेलाय. आता त्याला समोरचे आकडे दिसतात फक्त, शब्द पार दुरावले आहेत त्याच्यापासून. आता त्याला फक्त industry ला observe करता येतं, कला केव्हाच लांब निघून गेलीये. आता तो पण जगण्याच्या स्पर्धेत उतरलाय आणि नुसता पळत सुटलाय. कुठे पळत चाललाय त्याला पण माहिती नाहीये.
आधी पण सवय होती त्याला ह्या पळण्याची. पण तेव्हा तो पाळण्यातून सवड काढायचा. रेस विसरून जायचा. बरोबरीचे पार पुढे निघून जायचे आणि तो फक्त हसून त्यांना टाटा करायचा. कारण त्याला त्या rat race मध्ये नुसतच पळायचं नव्हत. थोडीशी उसंत काढून त्या झाडाखाली बसलं कि आपोआप हातात पेन यायचं आणि मग मागोमाग शब्दांना पळावयाचा तो. ह्या शब्दांना शोधायची गरज नव्हती पडली त्याला कधी. ते आपले स्वतःहून मुकाट्याने यायचे. पण आता कोण जाणो काय झालं होतं? शब्द हरवले होते आयुष्यातून त्याच्या. त्या शब्दांना शोधण्यासाठी पण थांबू शकत नव्हता तो.
पूर्वी असा एकटा नव्हता पडला तो. आजूबाजूला सतत चार लोक असायची. खरी नसली तरी त्याच्या हक्काची माणस होती ती. त्यांच्या तोंडून तो वाटेल ते बोलून घ्यायचा. त्याला वाटेल तसा आयुष्य फिरवायचा तो. आणि मग कंटाळा आला कि नवीन लोकांना सोबतीला घ्यायचा तो. आता मात्र त्याची अवस्था त्यांच्यासारखी झाली होती. त्याचा आयुष्य आता दुसरे वाटेल तसं फिरवत होते. त्यांना हवं तेच बोलत होता तो. आणि दुसरीकडे पळणं मात्र चालूच होतं.
आजूबाजूला अनेक लोकं पळत होती त्याच्या. त्याला मधूनच या पळण्याचा कंटाळा यायचा. पण जगाची एक अदृश्य शक्ती त्याला पळवत होती त्या सगळ्यांबरोबर. नाती, जबाबदार्या, बंधनं ढकलत चालले होते त्याला ह्या पळण्यात. त्याला दमायला पण परवानगी नव्हती. थांबायला तर नव्हतीच नव्हती. थांबला तर संपला असता ना तो.
पण पळता पळता त्याला कधीतरी जुन्या वाटा आठवायच्या. आताच्या वाटेतल एखाद वळण त्या वाटेला मिळत असेल ह्या विचाराने कायम वळायचा व्यर्थ प्रयत्न करायचा तो. आपले हरवलेले शब्द त्या वळणांमधल्या झाडात कुठेतरी सापडतील अशी त्याला अपेक्षा होती. पण वळण्यासाठीचे सगळे रस्ते अचानक one way झाले होते.
One way मध्ये घुसणं तर नियमबाह्य आणि हा तर काटेकोरपणे नियम पाळणारा. पण मग त्याला त्याचे जुने साथीदार दिसले. त्याच वळणांवर सारखे दिसत होते त्याला. पळता पळता त्याने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. एकच क्षण.. आणि त्याने मुख्य वाट सोडली आणि त्या माणसांबरोबर पळणं पण सोडून दिलं.
आता तो वळला होता. पुन्हा एकदा नियम तोडून one way मध्ये घुसला होता तो. त्याला त्याचं झाड पुन्हा सापडलं होतं. आता तो इथेच बसणार होता... चिरकाल निद्रेसाठी.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

उत्तर

उत्तर


तुझी ना कधी कधी खूप आठवण येते. तू अशी का जातेस ग लांब माझ्यापासून? मला ना खूप गोष्टी बोलायच्या असतात तुझ्याशी.. पण कधी कधी काय बोलू हे कळतच नाही. काय बोलायचं रोज रोज?
खरंतर ना रोज मला तुला एकाच गोष्ट सांगायची असते. पण साला ती गोष्ट अशी बोलता येत नाही. अश्या ना भावना मनात असतात, पण त्यांना तुझ्यासमोर कधीच शब्द सुचत नाहीत. मग पुन्हा तेच होतं. मी पुन्हा दुसर्या दिवशी ठरवतो, नवीन शब्द तयार करतो आणि ते शब्द पुन्हा ऐनवेळी दगा देतात.
आता ना मला तुझ्याशी बोलायची भीती वाटायला लागलीये. माहिती नाही का? पण एक अनामिक भीती बसलीये स्वतःबद्दल. तुझा message आला ना कधीतरी किंवा फोन आला तरी ही भीती माझा पाठलाग करत असते. कधी माझ मन मला दगा देईल आणि ती गोष्ट मी कधी बोलून जाईल मलाच कळेनास झालय. आता असह्य व्हायला लागलाय तुझ्याबरोबर राहणं, बोलणं, भेटणं. कायम ‘ती’च एक गोष्ट मनात.
खरच आपली मैत्री झाली तेव्हा बरा होतो मी. आता काय झालाय मला? का असे सारखे तुझ्याबद्दल विचार येतात? आणि ह्याने आपली मैत्री एक अगदी नवीनच वळण घेईल, हे का कळत नाहीये मला? कोणत ते माहिती नाही.पण त्यानंतर गोष्टी बदलातील नक्कीच. कदाचित तू मला हो म्हणशील कदाचित नाही. पण तू काहीच म्हणाली नाहीस तर? कळत नाहीये काय करू? कोणाला विचारू हे सगळ?
 काहीतरी मी तुझ्या बाजूचा पण विचार करायला लागतो. मग वाटत तुला पण असाच वाटत असेल का माझ्याविषयी? कधीच तुला काहीच वाटलं नसेल का इतके दिवसात? तुला पण कधीतरी सगळ सांगून टाकाव असा वाटलं नसेल? मला ना ह्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीयेत. मला सारखा वाटतय कि फक्त तुझ्याकडे उत्तरं आहेत. पण हे प्रश्न नेमके तुला विचारता पण येत नाहीत. अस्वस्थ मी. आणि तू? माहिती नाही.
तू हि अशी लांब माझ्यापासून. Communication चे सगळे mediums एवढे जवळ. हे physical distance खरंतर नाही separate करत आपल्याला. काय separate करताय मग? का मी रोज तुझ्या फोन ची वाट बघतोय? का तुझ्या त्या एका message ची वाट बघतोय मी? काय झालाय मला? काय बदललंय आपल्यात? बारा झाला तू आत्ता एवढी लांब आहेस माझ्यापासून. गोंधळ चाललाय डोक्यात नुसता. कान बंद केले तरी ऐकू येणारा.
पण एवढ्यात फोन वाजतोय. कोण आहे रे? मी वैतागून फोन हातात घेतो. बघतो तर तूच. Confusion वाढत चाललंय. उचलू? नको उचलू? काय करू? पण मी नाही करू शकत अस तुझ्याबरोबर. मी फोन उचलतो आणि फक्त hello म्हणतो. तिकडून तुझी नुसती बडबड चालू होते. मी आजपण तुझ्याशी काहीच बोलत नाही. पण आता गोंधळ शांत झालाय. फोन ठेवल्यावर पण अस्वस्थ वाटत नाहीये.उत्तरं सापडलाय.
मला काहीच सांगायचं नाहीये तुला... फक्त एक संवाद... आणि हे अंतर... खर नाही.. पण तुला समजलंय.. आणि मलाही