शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

गोंधळ




सध्या JNU वरून जो की गोंधळ चाललाय, तो गोंधळ माझ्या आतल्या आवाजाशी relate व्हायला लागलाय. सगळेजण आजूबाजूला गोंधळ घालताएत. Anti India Slogans, Nationalism, राष्ट्रहित, माझी बाजू, तुझी बाजू, ह्याची बाजू, फेसबुक वर post; आत कुठेतरी हाच गोंधळ सुरु होतो. माझा देश, माझी देशभावना, माझा आवाज. हा आवाज, ही भावना एक गोंधळ चालू करते आतल्या आत.

कट्ट्यावर १६ मे ला मोदीविजय साजरा करताना, आता सगळं कसा छान होणार ह्याच्या चर्चा चालू असताना, आता देशाची image चांगली होणार ह्याची स्वप्ना रंगवताना मनातला गोंधळ आता शांत होणार असा वातावरण तयार झाल होतं. पण मी तिकडे पण शांत होतो. राजकीय परिस्थितीबाबत आपण अजून उदासीनच, अशी भावना व्हायला लागली होती. किंवा त्या राजकीय बदलाबाबत प्रश्न पडत होते. विश्वास कोणावर आणि का ठेवायचा? परिस्थिती बदलणार म्हणजे नक्की काय होणार? शेवटचा प्रश्न स्वार्थावर येऊन थांबतो; ह्याने माझ्या जगण्यावर काय फरक पडणार आहे?

कोणत्याही विचारसरणीशी एक होणं मला कधीच जमल नाही. कधी वाटतं congress बरोबर, कधी वाटतं भाजप, डाव्यांच कधी काही चुकीच वाटतच नाही. पण सगळ्याच विचारसरणी जुनाट वाटायला लागल्यात. त्याचा माझ्या जगण्याशी काही संबंध उरला नाही असं वाटत असताना कुठेतरी सामान्य घरातल्या कोणावर तरी ह्या किंवा त्या विचारसरणीच्या लोकांचा हल्ला होतो. ह्या हल्ल्याच्या समर्थनार्थ किंवा विरोधात लोकं मोठमोठ्याने घसा फाडायला लागतात. वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून यायला लागतात. ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते असा भासवलं जातं. You have to be on one of the side to be safe.

इकडून भ्रष्टाचाराचे, देश लुटल्याचे दाखले दिले जातात; सावरकरांच नाव वापरल जातं. तिकडून स्वातंत्र्य लढ्याचे, देशाच्या प्रगतीचे दाखले दिले जातात. गांधीजींच नाव वापरलं जातं. मग युद्ध चालू होतं, गांधी विरुद्ध सावरकर. माझ्या मनात सुद्धा ते युद्ध पेटत. मी सावरकर वाचायला घेतो; विचार पटतात. मी गांधी वाचायला घेतो; विचार पटतात. युध्द तसच विचारांचा गोंधळ उडून जातो. हा गोंधळ बाहेर चाललेल्या गोंधळाचा आवाज असतो. तो वाढत जातो. पण कुठेतरी ते प्रकरण शांत होतं, किंवा शांत केलं जातं. त्या प्रकरणाचा ज्याला जसा पाहिजे तसा फायदा घेऊन झालेला असतो. मनातला गोंधळ आतल्या आत दबला जातो.

आता सरकार बदलतं; पुन्हा एकदा एखादा कन्हैया कुमार जेल मधे जातो. पुन्हा एकदा सगळ्यांकडून गोंधळ सुरु होतो. मनात विचारांचं वादळ घोंघावायला सुरु होतं. आपण नक्की कोणाला support करायचा? मी एक विद्यार्थी, मी nationalist, मी धर्म-जात न मानणारा, मी हिंदू, मी? मी नक्की कोण? हा प्रश्न उभा राहायला लागतो. Media ह्या सगळ्या गोंधळात सगळ्यात प्रवाही आणि प्रभावशाली. प्रकरणाचा गोंधळ चालू ठेवण्यात पटाईत. आम्ही रोज फेसबुक वर post  पाहायच्या, रोज टीव्हीवर बातम्या पाहायच्या. जिकडे तिकडे आम्हाला कन्हैय्या कुमार, त्याचे समर्थक आणि विरोधक दिसतात. सगळ्या पक्षाचे सगळेजण The Hour with Someone मध्ये गोंधळ घालताना दिसतात. देशभक्तीची उदाहरणं दिली जातात, freedom of expression च तुणतुण वाजवलं जातं, university मध्ये पोलीस घुसतात ह्यावर आश्चर्य व्यक्त केलं जातं.

ह्या सगळ्या काळात पण मी शांतच असतो. काय बोलावं? कोणाकडून बोलावं? ह्या घटनेच्या वेगवेगळ्या versions फिरायला लागतात. प्रत्येक version logically बरोबर. प्रत्येक जण बरोबर वाटायला लागतो. पण नेमकं विरोधक त्यात त्रुटी दाखवून देतो आणि मग गोंधळ पुन्हा सुरु; बाहेर आणि आत पण.

थोडे दिवसांनी news hour मधून विषय बाजूला जायला लागतो; prime time च्या ऐवजी बातमी superfast 50 मध्ये जायला लागते. पहिल्या पानावरून बातमी हळू हळू मागच्या पानांवर सरकायला लागते. माझा बातमी मधला रस आपोआप कमी व्हायला लागतो. कदाचित ज्यांना ह्या गोष्टीचा फायदा घ्यायचाय, त्यांचा फायदा घेऊन झालाय, हा युक्तिवाद मनातल्या गोंधळाला शांत करायला लागतो.
ह्या सगळ्याचा माझ्याशी जोडायचा प्रयत्न निरर्थक ठरतो. कोणत्याच विचारसरणीचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. मी अधिक insensitive होत जातो. घरी आल्यावर  बातम्यांऐवजी पुन्हा एकदा रटाळ मालिका, shows चालू होतात. फेसबुकवर देशभक्तीच्या post आज पण like करतो; पण comment मात्र कशावरच नाही. माझ्या रोजच्या जगण्यावर काहीच फरक पडलेला नाहीये. कट्ट्यावर मित्र अजूनही तसेच भांडतात. मी मात्र अजूनही शांत.

1 टिप्पणी: